Sunday, August 5, 2012

अण्णा हजारे यांच्या राजकीय विकल्पात सहभागी व्हा! - किशोर तिवारी यांचे आवाहन

अण्णा हजारे यांच्या राजकीय विकल्पात सहभागी व्हा! - किशोर तिवारी यांचे आवाहन 

प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घ्या
***अण्णा हजारे व स्वामी रामदेवबाबा यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण देशात वातावरण निर्माण केले आहे.परंतु, त्यांच्या आंदोलनात अन्न, वस्त्र, निवारा व दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या समस्यांना प्रामुख्याने जागा दिसत नाही. शेतकर्‍यांच्या व ग्रामीण जनतेच्या आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या समस्येवर त्यांच्यासोबत दलित, आदिवासी व ग्रामीण जनता दिसत नाही, अशा परिस्थितीमध्ये राजकीय पर्याय देण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी मदत करावी. स्वामी रामदेवबाबा व अण्णा हजारे यांनी गरीबांसाठी व सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा सल्ला तिवारींनी दिला.***

स्थानिक प्रतिनिधी /५ ऑगस्ट यवतमाळ : प्रशासन व राजकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. अण्णा हजारे यांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राजकीय विकल्पाची संकल्पना मांडली. या निर्णयाचे विदर्भ जनआंदोलन समितीने स्वागत केले असून, समाजातील संवेदनशील व सुजाण जनतेने व युवा पिढीने या राजकीय चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या, आदिवासींचे कुपोषण, औद्योगिक क्षेत्रात असलेला मागासलेपणा याला राजकीय व प्रशासनातील भ्रष्टाचारच जबाबदार असल्याचा आरोप तिवारींनी केला आहे. शाळेत शिक्षक नाही, दवाखान्यात डॉक्टर व औषध नाही, सुशिक्षित युवकाला रोजगार नाही.
शेतकर्‍यांच्या घामाला दाम नाही व ६६ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही देश अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मूलभूत सुविधा देऊ शकला नाही. याला भ्रष्ट राजकीय व्यवस्था जबाबदार आहे. १९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली व देशातील युवक यांच्या हाकेवर राजकीय चळवळीत आला. मात्र, जयप्रकाश नारायण यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न होत आहे. असा ऐतिहासिक प्रसंगी सर्वांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा व पोटभरू धोरण बाजूला ठेवत या राजकीय क्रांतीच्या प्रयत्नाला बळकटी देण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.

No comments: